डॉ. बाबासाहेब आंबेडकर ! हे व्यक्तिमत्त्व तसे एका विशेषणाच्या चाकोरीत मावणे अशक्यच ठरेल. बेशकिमती कोहिनूर हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात, त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या याच ‘अनेक पैलूंपैकी ‘लेखक’ हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू ठरलेला आहे. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेली ग्रंथसंपदा, ही येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा ही इतिहास, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण, धर्म, समाजकारण, जात अशा विविध विषयांनी श्रीमंत झालेली आहे. त्यांनी जे लिखाण केले व ज्याला ग्रंथांचे स्वरूप दिले असे एकूण २३ ग्रंथ सांगता येतील. यांमधील काही ग्रंथ त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले, तर काहो त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित केले गेले. बाजारात उपलब्ध असलेल्या या ग्रंथांची एकूण पृष्ठसंख्या ३,५०० च्या जवळपास आहे. एकूण पृष्ठसंख्या पाहता असे वाटते, की एखादा गाढा अभ्यासक व विद्वान माणूसच या ग्रंथांचा अभ्यास करेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे लेखनकार्य केवळ विद्वानांपुरतेच मर्यादित न राहता सर्वसामान्य वाचक व तरुण पिढी या सर्वांपर्यंत सहज पोहचायला हवे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.
या पुस्तकाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २१ ग्रंथांचे सार एकाच ग्रंथात वाचकांना उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. ज्या वाचकांना बाबासाहेबांचे समग्र ग्रंथ वाचन करणे कठीण वाटते त्या सर्व वाचकांसाठी एकाच ग्रंथाच्या रूपात बाबासाहेबांच्या २१ ग्रंथांचे सार उपलब्ध करून देण्याचा मला आनंद आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहिलेली प्रत्येक ओळ आणि त्यात व्यक्त केलेला प्रत्येक विचार हा महत्त्वाचा असल्यामुळे, अंतिमतः त्यांचे मूळ ग्रंथ वाचकांना वाचण्याची प्रेरणा मिळणे व त्याबद्दल कुतूहल आणि आवड निर्माण होणे हाच या पुस्तक लिहिण्यामागचा खरा हेतू आहे. हे पुस्तक सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे व फायदेशीर ठरेल असा मला विश्वास वाटतो.
Reviews
There are no reviews yet.