Description
जुन्नरच्या इतिहासाला आणि वर्तमानाला एक व्यावहारिक व व्यावसायिक अंग असल्याचे भानही ग्रंथात विविध ठिकाणी प्रकटले आहे. बहमनी, मोगल आणि मराठे यांच्या काळात जुन्नर हे कागदनिर्मितीचे केंद्र असल्याची आणि ‘कागझी’ या कारागीरांच्या वर्गाची ख़ास दखल घेतलेली आढळते. शासकीय पातळीवर शिवनेरी किल्ला हे शिवजन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ आणि संरक्षित वास्तु’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आणि त्याबाबतचा अधिकृत शासननिर्णय यांची पद्धतशीर दखल डॉ. लहू गायकवाड यांनी घेतलेली आहे. इतिहास आणि पर्यटनाच्या माध्यमातून किल्ल्यांचे जे योग्य ते ‘मार्केटिंग’ राजस्थान राज्याने केलेले आहे, ते उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून आपली शासकीय यंत्रणा आणि समाज यांनी एकत्रित पावले टाकण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शिवनेरीसारख्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव ते करून देतात, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. गडांवर प्लास्टिक, काच, कचरा या गोष्टी टाकू नयेत, याची जाणीव ते व्यक्त करतात. भारतात भूजल विनाशाची समस्या ओढवत चाललीय. ‘जलाशये निर्मावी’ हा संत ज्ञानेश्वरांचा उपदेश, यादवकालीन ऐतिहासिक बारव स्थापत्य व त्यावर डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी केलेले सखोल संशोधन, रामचंद्र अमात्य यांच्या ‘आज्ञापात्रा’सारख्या साधन-ग्रंथातून दिसून येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जलनीती व त्यांचे गडकोटांवरील जलव्यवस्थापन, जुन्नरमध्ये शाहजहानचे वास्तव असलेल्या आणि सध्या सुजीत मेहेर यांच्या मालकीच्या इमारतीतील अर्धवर्तुळाकृती खापरी नळ, भूगर्भातील जलासंबंधीचे डॉ. पंडित विद्यासागर यांच्या ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ या ग्रंथातील दाखले अशा साऱ्या चर्चेतून डॉ. गायकवाड यांनी केलेली ऐतिहासिक मांडणी वर्तमानासाठी किती उद्बोधक आहे !

Reviews
There are no reviews yet.