Description
“ज्या घोषणेत तुम्ही भारतमातेच्या विजयाची इच्छा बाळगता ती ही भारतमाता कोण आहे?’ असा प्रश्न १९३६ मध्ये एका सार्वजनिक सभेत जवाहरलाल नेहरूंनी विचारला होता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे आघाडीचे नेते आणि पुढे देशाचे पहिले पंतप्रधान झालेले हे तेच जवाहरलाल होते. त्यांनी या भाषणात नंतर असे जाहीर केले होते की, भारतातील पर्वत आणि नद्या. जंगले आणि अफाट शेते या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रिय होत्याच, पण तरीही अखेरीस या विशाल भूमीत सर्वत्र पसरलेले भारतातील लोकच जास्त महत्त्वाचे होते… भारतमाता म्हणजे हे कोट्यवधी लोकच असले पाहिजेत आणि भारतमातेचा विजय याचा अर्थ या लोकांचा विजय असाच असला पाहिजे. ‘हे पुस्तक आपल्याला या लोकशाहीवादी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामागे असलेल्या प्रामाणिक मनाचे, त्याच्या विचाराचे दर्शन घडवते. सध्याच्या ज्या काळात भारताच्या कोट्यवधी रहिवाशांना आणि नागरिकांना वगळणाऱ्या भारताच्या जहाल कल्पनांची उभारणी करण्यासाठी ‘राष्ट्रवादाचा’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणेचा वापर केला जात आहे, विशेषतः त्या काळात हे पुस्तक सुसंगत, समयोचित ठरते.
कोण आहे भारत माता ? (‘हू इज भारत माता ?’ ) या पुस्तकात नेहरूंच्या अभिजात पुस्तकांतील निवडक लेखांचा समावेश आहे. अॅन ऑटोबायोग्राफी, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आणि द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. याखेरीज त्यांची भाषणे, निबंध आणि पत्रे आणि त्यांच्या काही अतिशय स्पष्ट मुलाखतीही यात अंतर्भत आहेत. या संकलनाच्या दुसऱ्या भागात महात्मा गांधी, भगतसिंग, सरदार पटेल, मौलाना आझाद, अरुण असफ अली, शेख अब्दुल्ला, रामधारी सिंग ‘दिनकर’, अली सरदार जाफ्री, बलदेव सिंग, मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, रिचर्ड अॅटनबरों, ली कुआन यू, अटल बिहारी वाजपेयी आणि इतर काही जणांनी केलेले नेहरूंचे मूल्यमापन आहे. विविध लेखकांनी लिहिलेल्या लेखांच्या या व्यापक संग्रहातून आणि त्याला लाभलेल्या माहितीपूर्ण प्रस्तावनेतून, कल्पनांनी आणि कार्याने अत्यंत आगळ्यावेगळ्या, लक्षणीय व्यक्तिमत्त्वाच्या स्वरूपात पंडित नेहरूंचे दर्शन आपल्याला घडते. भारताच्या सुसंस्कृत जगताच्या चैतन्याचे उत्स्फूर्त आकलन असलेला, वैज्ञानिक प्रवृत्तीशी सुस्पष्ट बांधिलकी असलेला, राजकारणात काही गोष्टी करणे भागच असले तरीही लोकशाहीवादीच राहिलेला नेता म्हणून नेहरूंचे दर्शन आपल्याला घडते. त्यांचा वारसा अत्यंत महत्त्वाचा आहे कदाचित आपल्या इतिहासातील इतर कुठल्याही काळापेक्षा तो आज जास्तच महत्त्वाचा आहे.
Reviews
There are no reviews yet.