Description
“घटनेप्रमाणे भारत निधर्मी व लोकशाही आहे. समाजवादाचेही त्याच्यापुढे उद्दिष्ट आहेच! अशा अवस्थेत जुनाट जातीधर्मभेद व स्पृश्यास्पृश्यता लोकशाहीला पूरक नाहीत. म्हणून साहित्य जे निष्पन्न करावयाचे ते राष्ट्रीय एकात्मतेस पूरकच होणारे असावे. त्याने भारताच्या हितास्तव नव्या समाजप्रबोधनास जन्म द्यावा. ललित साहित्याचेही हेच ध्येय व्हावे. त्याने नवप्रबोधन करावे. नव्याने समाजाची बांधणी व नवी धारणा करावयाची आहे. मागील समाज प्रबोधन खेड्यापाड्यांत जाऊन भिडले नव्हते. त्या समाजप्रबोधनाचा काळ पारतंत्र्यातील होता. आता स्वातंत्र्यात नवे समाजप्रबोधन होणे क्रमप्राप्त आहे. नव्या प्रबोधनाला मागील प्रबोधन पायाभूत आहेच. तथापि गेल्या शतकात जे प्रबोधन झाले, ते आता बरेच जुने झाले आहे. होऊन गेलेल्या प्रबोधनाची दाट छाया भारतीय घटनेवर पडली आहे. डॉ. आंबेडकर हे वरील प्रबोधनातील महत्त्वाचे पुरुष झाले, त्यांनी तर घटना तयार केली. परंतु घटनेतील तत्त्वाप्रमाणे नवे समाजप्रबोधन अवतरले नाही. त्याचे नवे स्वरुप प्रगट करणारा म. गांधी यांच्याप्रमाणे स्वातंत्र्य आल्यानंतर तितक्याच तोलामोलाचा पुरुष झाला नाही. परंतु लोकशाहीत अवताराची वाट पाहणे शहाणपणाचे नाही. जरुर तो लोकशाहीने स्वतःच नवा अवता घेतला पाहिजे. केवळ सत्तेची व मत्तेची उपासना अयोग्य आहे
भारताची चालू राजकीय परिस्थिती व पक्षोपक्षातील बेदिली यादव अत्यंत दुर्दैव ओढविणारी आहे. केवळ पक्षीय राजकारणामुळे भागणार नाही. घटना व राज्य निधर्मी आहे. तरी भारतात जे धर्म व विविध पंथ आहेत, त्यांनी नैतिक प्रेरणा निर्माण केली पाहिजे. राष्ट्र भ्रष्टाचाराकडे जात असेल तर त्याचा अधःपात नक्कीच ओढवतो. यासाठी बिनसरकारी जनजागरण हवे.”
Reviews
There are no reviews yet.