Description
ब्राह्मी लिपी भारतातील वाचता आलेली सर्वात प्राचीन लिपी असली तरी सातव्या – आठव्या शतकात नागरी लिपीचा आणि त्यानंतर प्रादेशिक लिपींचा भारतात प्रसार झाल्यावर जनतेच्या स्मृतिपटलावरून ती लिपी नष्ट झाली. दिल्लीचा सुलतान फीरूझशाह तुघलक याने पंजाबमधील अंबाला जिल्ह्यातील टोपडा आणि मीरत येथील अशोकाचे स्तंभलेख मोठ्या परिश्रमाने दिल्लीला आणविले. त्या लेखातील आशय समजावून घेण्यासाठी विद्वानांना पाचरण केले. हे शिलास्तंभ आणण्यास किती परिश्रम पडले याचे वर्णन शम्स – इ – सिराज याने तारीख – इ – फिरुझशाहीमध्ये केले आहे. सम्राट अकबरानेही या शिलालेखांच्या वाचनासाठी पुष्कळ विद्वानांना आमंत्रण केले ; परंतु उभय बादशहांच्या पदरी निराशाच पडली. त्यानंतर इंग्रजी कंपनीचे सरकार आले आणि भारतातील ऐतिहासिक दृष्टिकोन पार बदलून गेला. भारतात ग्रीस, इटली, चीन या देशांतल्याप्रमाणे इतिहासकार नव्हते. मुघल काळापर्यंत पद्धतशीर इतिहास लेखन करण्यासाठी राजे लोकांच्या दरबारी इतिहासकार असल्याचे दिसून येत नाही. या खंडप्राय देशाचे प्राचीन इतिहास वैभव, वास्तु वा मूर्ती, शिल्प, शिलालेख, ताम्रपट, मृण्मय मुद्रा, नाणी इत्यादी मध्ये विखुरलेले आहे याची जाणीव कंपनी सरकारच्या सनदी नोकरांना झाली. त्यांतील काही लोक हौस म्हणून प्रथम नाणी जमाविणे, शिल्पे गोळा करणे इत्यादी कार्य करू लागले. कलकत्ता येथील सुप्रीम कोर्टाचे जज्ज सर विल्यम जोन्स यांनी प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी १५ जानेवारी १७८४ इत्यादी मध्ये एशियाटिक सोसायटी स्थापन करून इसवी सन १७८८ मध्ये ‘ एशियाटिक रिसचेंज ‘ हे नियतकालिक सुरू केले. या नियतकालिकामध्ये शिल्प, नाणी या विषयाबरोबरच जुनी हस्तलिखिते, शिलालेख आणि ताम्रपट यावरील अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध होऊ लागले.
Reviews
There are no reviews yet.