Description
ब्रिटिशांनी पेशवाईचा अंत केल्यानंतर नेवासा ब्रिटिशांच्या सत्तेचा भाग बनला. नेवासा परिसर आणि अहमदनगर जिल्हयाच्या संपूर्ण उत्तर भागात राघोजी भांगरे यांच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्यात आला. ब्रिटिशांनी संकरित जनावरांची पैदास करण्यासाठी नेवासा येथे मुख्य केंद्र स्थापन केले होते. राष्ट्रवादाच्या उदयानंतर संपूर्ण भारतात राष्ट्रीय चळवळ जोर धरु लागली आणि नेवासा सुद्धा याला अपवाद नव्हता. फेब्रुवारी १९२७ मध्ये महात्मा गांधींनी अहमदनगर जिल्हयात काही सभा घेतल्या होत्या तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या एका वार्षिक अधिवेशनास पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांसारखे दिग्गज नेते हजर होते. १९२०, १९३० आणि १९४२ च्या तीनही आंदोलनात नेवासा तालुक्यातील जनतेने हिरारीने सहभाग घेतला होता. कान्हू- काळू सूर्यवंशी या क्रांतीकारकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. १९४२ चे चलेजाव आंदोलन हे प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर भूमीगत पद्धतीने चालविण्यात आले, तेव्हा बेलपिंपळगाव येथील छापखान्यात गुप्तपणे ब्रिटिश सरकारच्या विरोधात पत्रके छापली जात होती. यावेळी तालुक्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको सारखी आंदोलने करण्यात आली. एकूणच नेवासा तालुक्यातील जनता भारतीय स्वातंत्र्यलढयात मोठया हिरीरीने सहभागी झाली होती.
Reviews
There are no reviews yet.