Description
हिंदूसमाज म्हणजे फ्रान्सच्या बर्बून राजघराण्याप्रमाणे काही शिकत नाही व काही विसरत नाही. ( Learns and forgets nothing ) हिंदू समाज इतका कोडगा असला तरी त्याच्या अंगी आपल्या अस्तित्त्वाचे तात्पुरते संरक्षण करण्याइतका लवचिकपणा आहे हे ही मात्र कबूल केले पाहिजे. पर्याय शोधून काढण्यात हिंदू धर्मातल्या शास्त्री पंडितांचा कोणी हात धरू शकणार नाही. वेळ पडेल त्याप्रमाणे वाटेल तशी तडजोड करणे आणि आलेली वेळ कशीबशी मारून नेणे हा हिंदू समाजाचा जन्म स्वभावच आहे. या लवचिकपणामुळेच, ” महापुरे झाडे जातो ! तेथे लव्हाळे वांचती ” या न्यायाने तो आत्तापर्यंत टिकून राहिला. बाकी, असले जगणे कितपत श्रेयस्कर आहे हा प्रश्न अलाहिदा. हा लवचिकपणा केवळ तात्पुरत्या आत्मसंरक्षणालाच उपयोगी पडू शकतो. समाज पुरूषाची शरीरप्रकृती निकोप होण्यास आणि त्याचे सामर्थ्य वाढण्यास त्याच्या शरीरांतील सर्व दोष अगोदर निघून गेले पाहिजेत.
हिंदूमहासभेची चळवळ ही कृत्रिम, आकुंचित दृष्टीची, ध्येयशून्य व तत्त्व पराड़:मुख आहे. अस्पृश्यांविषयी खरी कळकळ त्या चळवळीच्या पुढाऱ्यांत नाही. अस्पृश्यांनी धर्मांतर करू नये व त्यामुळे हिंदूंचे संख्याबळ कमी होऊ नये एवढ्याच उद्देशाने हिंदूमहासभावाल्यांनी अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हाती घेतलेला आहे. अर्थात त्यांत जीवंत कळकळ नाही. जेव्हा केवळ न्यायाच्या व समतेच्या दृष्टीनेच विचार करण्यास आणि मानवी हक्कांविषयी तळमळ बाळगण्यास हिंदूसभावाले शिकतील तेव्हाच त्यांच्या चळवळीत खरा जीवंतपणा येईल. आज हिं. म. सभावाल्यांना चातुर्वर्ण्याची चौकट मोडून टाका म्हणून सांगितले तर ते रुचत नाही व ते त्यांच्या बुद्धीलाही पटत नाही. हिंदू समाजाची प्रगती खुंटविणारी, त्यांची शकले पाडणारी, त्याला हतबल करून टाकणारी जातीभेदपद्धती कायम ठेवून खरे हिंदू संघटन होणे शक्य नाही, अर्थातच जातिभेदजन्य उच्चनीचपणा कायम ठेवून जे संघटन होत आहे ते केवळ संघटनाचे सोंग आहे.
Reviews
There are no reviews yet.