Description
सकाळचे वर्तमानपत्र उघडताच एक ठळक बातमी नजरेस पडली, जामनगरच्या प्रख्यात हार्टसर्जनचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला, वय अवघे ४१ वर्षे. ज्या सर्जनने हजारो हृदय शस्त्रक्रिया केल्या असतील, अनेक रुग्णांना जीवदान दिले असेल, त्यांचा असा अचानक मृत्यू व्हावा याची खंत वाटली. त्याच महिन्यात आणखी एक बातमी आली की, बंगलोरचा एक विद्यार्थी त्यांचा ही हार्ट अटॅकने मृत्यू झाला. वय अवघे २७ वर्षे. दोघेही निर्व्यसनी, व्यायाम करणारे अर्थातच आरोग्याची काळजी घेणारे. मग असे अचानक का व्हावे ? यावर चिंतन केले. एवढ्या तरुण वयात, उमेदीच्या काळात असा मृत्यू होणे म्हणजे कुटुंबाचे व समाजाचे मोठे नुकसान आहे. विशेषतज्ज्ञांचे अकाली जाणे चिंताजनक आहे. त्यासाठी आजच्या पिढीच्या दैनंदिनीवर लक्ष वेधले. आजचा मनुष्य निसर्गापासून खूप दूर गेला आहे. त्याला रोजच ताणतणाव, हवेतील प्रदूषण, खाण्यातील भेसळ या व अनेक समस्यांना तोंड देत जीवन जगावे लागत आहे. या धकाधकीत तो आजारापासून निसटण्याचा प्रयत्न करतो आहे. तो फक्त योग्य आहारामुळेच वाचू शकतो. वैद्यकीय शास्त्राचे पितामह ”हिपोक्रेटस” हे ग्रीक तत्त्वज्ञ डॉक्टर म्हणतात की, योग्य आहार हेच औषध आहे. नैसर्गिक अन्न हे रोगप्रतिबंधक व रोग दुरुस्त करण्यासाठी उपयोगी होवू शकते. निसर्ग निर्मित भाज्या, फळे हे नैसर्गिक अन्न आहे. त्यात पोषकतत्त्वे, जीवनसत्त्वे, खनिजे व संप्रेरक असतात, ती आजारांशी लढा देऊ शकतात. कच्चा भाजीपाला, फलाहार, रसाहार हे सर्व गरजा पूर्ण करते.
आजच्या असंतुलित आहारामुळे अतिपोषण किंवा कुपोषक, मधुमेह उच्चरक्तदाब, कर्करोग इत्यादी विकार होतात. त्यासाठी समतोल आहार, नियमित व्यायाम, विश्रांती ही आवश्यक आहे. निसर्गनियमाप्रमाणे जीवन जगले, तर आपण शंभरी पार करू शकतो. निसर्गनियमाप्रमाणे वागले तर आपण व्याधीमुक्त व दीर्घायुषी होऊ शकतो.

Reviews
There are no reviews yet.