Description
महात्मा जोतीराव फुल्यांचे असत्यावर कोरडे ओढणारे आणि सत्याचा शोध घ्यायला लावणारे हे वाङ्मय त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर 120 वर्षांनी सुद्धा बहुसंख्य असलेल्या स्त्री शूद्रादि अतिशूद्रांनी वाचले नाही आणि ब्राह्मणांच्या कावेबाजपणातून त्यांची सुटका झाली नाही. परंतु ज्या थोड्याफार लोकांनी त्यांचे हे समग्र वाङ्मय वाचले असेल तर त्यांनी निदान स्वत:च्या प्रपंचात जोतीबांनी अभिप्रेत असलेला बदल दिसावयास हवा होता आणि त्यांच्याकडून ह्या साहित्याचा प्रसार आणि प्रसार करण्यात यायला हवा होता आणि असत्याचे सामाजिक प्रदर्शन बंद व्हायला हवे होते. दुर्दैवाने आजही तसे झालेले दिसत नाही.
कार्यक्रमात, समारंभात जोतीबा केवळ नावासाठी वापरले जातात. त्यांनी सांगितलेल्या स्त्री पुरूष समानता, विद्यादान, शेतकऱ्यांचे प्रश्न कोणीही पोटतिडकीने सोडविताना दिसत नाहीत. कारण बहुसंख्य समाज हा ब्राह्मणी वर्णवर्चस्वातून मुक्त झालेला नाही. तो जाती व्यवस्थेतच अडकून पडल्याने मानसिक गुलाम झालेला दिसून येतो. बहुजन वर्गाची मानसिक गुलामगिरी इतक्या खोल रुतून बसली आहे की, आपल्या साऱ्या क्रांतिकारी संतांची नावे तो जातीने घेतो. त्यामुळे त्यांचे विचार त्यांच्या जाती पुरतेच सिमित राहतात आणि जातीचे लोक तो विचार आत्मसात करणे तर सोडाच पण वाचत सुद्धा नाहीत. संतांच्या मालिकेत तुकाराम कुणबी असतो. नरहरी सोनार असतो. सावता माळी असतो, छगन कसाई असतो, चोखोबा महार असतो, पण ब्राह्मणी समाजातला संत ज्ञानेश्वर माऊली असतो. रामदास स्वामी असतो, ब्राह्मणाला त्याची जाट लावण्याची गरज वाटत नाही. कारण तो सर्वश्रेष्ठ असतो. शिवाजी राजा क्षत्रीय असला, राजा असला तरी तो शूद्र असतो, संभाजी राजे, शाहूजी महाराज शूद्र असतात, जोतीराव फुले माळी असतात. अण्णाभाऊ साठे मातंग असतात, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महार असतात. त्यांचा त्यांच्या जातीतच बंद करण्याचा कुटील ब्राह्मणी कावा जोपर्यंत बहुजन समाजाच्या मानगुटीवर बसलेला असेल, तोपर्यंत हे शक्य नाही आणि हेच खरे या देशाच्या अधोगतीचे कारण आहे. सुशिक्षित म्हणविणारा वर्ग ही जेव्हा ह्या अवस्थेत मश्गूल असतो तेव्हा ही वर्ण व्यवस्था अधिकाधिक चिवट होत जाते.

Reviews
There are no reviews yet.