Description
शिवछत्रपतींचे आयुष्य म्हणजे चमत्कार खरा. पण तो दैवी चमत्कार नव्हे. त्यामागे होता शिवरायांचा पराक्रमी पुरुषार्थ. बुद्धी, विचार, धाडस, हिंमत, संवेदनशीलता, मुत्सद्देगिरी, द्रष्टेपणा अशा अनेक गुणांच्या समुच्चयातून शिवराय नावाचे हे उत्तुंग शिल्प घडलेले आहे. ते समजून घ्यायचे असेल, तर आपणास आपली दृष्टी विस्तारावी लागेल. दशदिशांनी हे शिखर न्याहाळावे लागेल.
सदानंद कदम यांनी ‘गाथा स्वराज्याची’ मधून हाच प्रयत्न केला आहे. शिवराय म्हणजे केवळ लढाया नव्हेत. केवळ अफजलवध, शाहिस्तेखानावरील छापा, आग्र्याहून सुटका, ‘गड आला पण सिंह गेला’ हे एवढेच म्हणजेही शिवराय नव्हे. हे तर आहेच, पण असेच आणखीही काही लखलखते पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला. त्यांची दूरदृष्टी राजनीती, अर्थकारण, प्रशासन, व्यवस्थापन, राष्ट्रवाद, त्यांचे व्यवहारचातुर्य, त्यांचे शौर्य, त्यांची गुप्तचर संस्था आणि त्यांची लोकहिताची कळकळ या सगळ्यातून आकारास आलेला मर्हाठीमेरू. सदानंद कदम यांनी या पुस्तकातून शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील या अशा विविध पैलूंचा मोठ्या जाणकारीने वेध घेतलेला आहे. याचे वेगळेपण हे ठरते, की हा केवळ रुक्ष इतिहास नाही, यात रोचकता आहे. यात भावना आहेत. एका शिवप्रेमीने अन्य शिवप्रेमींच्या काळजात शिवप्रेमाची मशाल बुद्धिपूर्वक तेजाळत राहावी यासाठी कळकळीने मांडलेला हा अभ्यासपूर्ण प्रपंच. विकृत इतिहासाच्या ध्वजदंडावर अस्मितांच्या पताका उभारण्याचा हा काळ. अशा काळात शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारे हे पुस्तक अत्यावश्यक होते.

Reviews
There are no reviews yet.