महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रामुख्याने सामाजिक परिवर्तनावर भर देणारे विचारवंत होते, पण ते नुसतेच विचारवंत नव्हते, तर लोकविलक्षण कृतिवीर होते. प्रत्यक्ष कृतीने नवी वहिवाट तयार करण्याची त्यांची धडपड होती. त्यांनी त्यांचे ऐतिहासिक कार्य केले; तथापि, आपण इतके कर्मदरिद्री व करंटे ठरलो की त्यांच्या क्रांतिकारक सामाजिक विचारांचा आणि आचारांचा आशयच मुळी आपण ओळखू शकलो नाही. दि. २ जानेवारी, १९४४ रोजी जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला अतिशय मर्यादित लोक उपस्थित होते. एवढेच नव्हे, तर मराठा जातीत जन्माला येऊनही आपले संपूर्ण आयुष्य त्यावेळी ‘अस्पृश्य’ म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि सामाजिक रचनेमध्ये पशुतुल्य जीवन जगणा-या समाजासाठी समर्पित करणाऱ्या विठ्ठल रामजी शिंदेचा उल्लेख ‘महार शिंदे’ असा त्याकाळची काही मराठा मंडळी करीत असत. अस्पृश्य समाजासाठी विठ्ठलरावांनी आयुष्याची अक्षरश: बाजी लावली आणि आई, वडील, पत्नी, बहिणी व मुलेबाळे घेऊन महारवाड्यात आपले बि-हाड केले. त्या समाजाला त्यांच्या रक्तामांसाचे नेतृत्व मिळाल्यानंतर त्या वगनि विठ्ठलरावांचा दुस्वास करायला सुरुवात केली. विठ्ठलरावांच्या उपेक्षेचं मूळ यात आहे. या उपेक्षेमुळे त्यांच्या ऐतिहासिक कार्याचे महत्त्व कमी होणार आहे काय?

Reviews
There are no reviews yet.