Description
आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना परवा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.
अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जाट अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे व ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून – बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा त्यांची त्रेधा कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा. किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा. जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही, आधी नाही तरी मागाहून का होईना जलसमाधी ही घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, प्रत्यक्ष नव्हे, तरी अप्रत्यक्षपणे तरी नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार आहे, यात बिलकुल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पढतमूर्खांचे लक्षण शिकू नये.
Reviews
There are no reviews yet.